जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

On: September 8, 2026 7:45 PM

जळगाव : जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडमध्ये सहकाऱ्यांच्या आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. “निरोगी शरीर, शांत मन आणि सुरक्षित कार्यपद्धती” या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास सहकाऱ्यांचे आरोग्य चांगले राखण्याबरोबरच कार्यक्षमताही वाढण्यास मदत होते, असा संदेश कार्यशाळेतून देण्यात आला. सहकाऱ्यांनी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्यदायी जीवनशैली आणि कामाच्या ठिकाणी आरोग्याची काळजी घेण्याबाबत विविध माहिती जाणून घेतली. गांधी तीर्थच्या कस्तूरबा सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.

जैन इरिगेशन सिस्टीम्स, जैन फार्मफ्रेश फूड लि., भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिजिओथेरपी कार्यशाळेचे दीपप्रज्वलनाने सुरवात झाली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. कल्याणी नागुलकर, डॉ. हिमांशू भारद्वाज, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाचे डॉ. पायल संचेती, डॉ. साक्षी बरडिया, डॉ. हितांशी शिंदे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत सूतीहार देऊन केले.

‘फिजिओथेरपी हे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. फिजिओथेरपी हे शास्त्रीय दृष्टीने केल्यास ते औषध ठरते. शारिरीक स्वास्थ, रोगप्रतिकार शक्ती, मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आपलं शारिरीक स्वास्थ आपल्या हातात आहे असे आवाहन डॉ. कल्याणी नागुलकर यांनी केले. (Movement As Medicine) विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. स्ट्रोक ही यंदाची जागतीक फिजिओथेरपी दिनानिमित्त असल्याचे त्यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना दीर्घकाळ निरोगी व कार्यक्षम राहण्यासाठी योग्य शारीरिक ठेवणे, सुरक्षित कार्यपद्धती आणि ताण व्यवस्थापनाचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कामाच्या वातावरणातील विविध घटक, चुकीच्या किंवा अवघड पद्धतीमध्ये काम करणे, वारंवार होणाऱ्या हालचाली, अधिक शारीरिक श्रम, दृश्य ताण, शरीराच्या विशिष्ट भागावर पडणारा दबाव तसेच कंपन यामुळे थकवा, स्नायू व सांध्यांशी संबंधित समस्या (Musculoskeletal Disorders) निर्माण होऊ शकतात, असेही डॉ. कल्याणी नागुलकर म्हणाले. ताणमुक्तीसाठी व्यायाम, योग-ध्यानाचा सल्ला त्यांनी दिला. मानसिक व शारीरिक ताण कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, विश्रांतीची तंत्रे, संगीत ऐकणे, बागकाम, ध्यान व योग यांचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला. कामाच्या धावपळीत शरीर व मनाला आवश्यक विश्रांती मिळणे गरजेचे असून, आवश्यकतेनुसार अल्प विश्रांती किंवा ‘पॉवर नॅप’ घेणेही उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले.

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या डॉ. पायल संचेती यांनी सादरीकरणातून औद्यागिक आरोग्य यावर भाष्य केले. त्यात त्यांनी ताणतणावाच्या प्रसंगी समस्या मनात न ठेवता कुटुंबीय व मित्रांशी संवाद साधणे, सकारात्मक सामाजिक संपर्क वाढविणे आणि आनंदी वातावरणात वेळ घालविणे याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. तसेच कोमट पाण्याने आंघोळ, हास्य-विनोद आणि आवडीच्या उपक्रमांमध्ये सहभाग यामुळे मनावरील ताण कमी करण्यास मदत होते, अशी माहिती देण्यात आली. डॉ. हिमांशू भारद्वाज यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले. जैन फूडपार्क येथील डॉ. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. किशोर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. गिरीष कुलकर्णी यांनी आभार मानले.

फिजिओथेरपी निरामय आयुष्याचा मार्ग – अशोक जैनअध्यक्षीय मनोगतात अशोक जैन म्हणाले की, व्यक्तीगत जीवनात फिजिओथेरपीमुळे खूप बदल झाला. वाढत्या वयासोबत काही आरोग्यविषयी समस्या निर्माण होतात. मात्र आपली कार्यक्षमता वाढायची असेल तर फिजिओथेरपीस्ट कडून योग्य सल्ला घेऊन शास्त्रीय पद्धतीने व्यायाम केले पाहिजे. दिवसातून थोडा वेळ त्यासाठी काढालाच पाहिजे. निरामय आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. आपल्यासह कुटुंब संस्थेचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल शांत झोप, योग्य व्यायाम, मानसिक स्वास्थासाठी ध्यान हे केले पाहिजे असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. फिजिओथेरपीबद्दल स्वत:चे अनुभव ही त्यांनी कथन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment