नवी दिल्ली : ‘भारत बंद’ ची हाक आणि सुरु असलेले शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी सात वाजता शेतकरी नेत्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. सरकारने येत्या 9 डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेण्याचे ठरवले असतानांच ही बैठक बोलावण्यत आली आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, दुकाने यासह इतर सेवा ठप्प करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी सिंधू, टिकरी आणि गाजीपूर बार्डरवर आंदोलनकर्त्या शेतकरी नेत्यांना बोलावण्यात आले आहे. यातील तेरा नेते अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबसह हरयाणाच्या शेतकरी बांधवांचे दिल्ली सीमेवर आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द होण्यासाठी शेतकरी आग्रही आहेत.
याबाबत सरकारसोबत चर्चा होवून देखील त्यातून निष्पन्न काहीच झाले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’चे आवाहन केले. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.