जळगाव : जळगाव शहरात इलेक्ट्रॉनिक मिटर नसलेल्या ऑटो रिक्षांवर कारवाई करण्याकामी आरटीओ विभाग सज्ज असल्याचे अद्याप दिसून येत नाही. कारवाईकामी मनुष्यबळ कमी असून पोलिस दलाचे कर्मचारी मदतीला मिळण्यासाठी या विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. शहर वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी आरटीओ विभागाच्या मदतीला मिळण्याकामी जिल्हा दंडाधिकारी प्रविण महाजन यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना पत्र लिहून विनंती केली आहे.
माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या पाठपुराव्यामुळे जळगाव शहरात धावणा-या रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मिटर बसवण्याचा मुद्दा शासन स्तरावर ब-याच प्रमाणात पुढे सरकला. मात्र मनुष्यबळ कमी असल्याचे कारण पुढे करत या कारवाईला पुन्हा ब्रेक लागला आहे. याकामी पोलिस अधिक्षक व्हाया जिल्हाधिकारी कार्यालय असा पत्रव्यवहार सुरु झाला आहे.