जळगाव : मानसिक भान हरपलेली विवाहिता गेल्या वर्षभरापासून जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील मालोद येथून बेपत्ता झाली होती. मानसिक भान हरपल्याने ती पायी पायी अगोदर नाशिक व नंतर अहमदनगरला पोहोचली. मात्र अहमदनगर येथील मानसेवा प्रकल्पात तिच्यावर योग्य ते मानसिक उपचार झाले व ती जळगावला सुखरुप परतली. गेल्या चार वर्षापासून या मातेची तिच्या चिमुकल्या मुलीपासून ताटातुट झाली होती. चार वर्षानंतर मायलेकी एकमेकींना मिळाल्याने दोघींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या बाविस वर्षाच्या विवाहीतेने गेल्या चार वर्षापुर्वी घर सोडले होते. दरम्यानच्या कालावधीत मिळेल ते खाऊन सदर विवाहितेने दिवस काढले. जळगाव येथून निघालेली सदर विवाहित तरुणी अगोदर नाशिकला पोहोचली. पायपीट करतच ती अहमदनगरला येऊन पोहोचली. महिला व बालविकास विभागाच्या वनस्टॉप सेंटरला ही विवाहीता आढळून आली. त्यांनी तिला मानसेवा प्रकल्पात पाठवले. डॉ. अनय क्षिरसागर व डॉ. सुरेश घोलप या दोघांनी तिच्यावर योग्य ते मानसिक उपचार केले.
सुरुवातीला काहीच न बोलणारी विवाहीता हळू हळू बोलू लागली. आठ दिवसांपुर्वी तिने तिच्या गावाचे नाव सांगितले. तिने सांगितलेल्या गावाचा शोध इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आला. या संस्थेच्या स्वयंसेवकांनी तिच्या गावाचा शोध घेत तिला सुखरुप घरी नेवून सोडले. तिच्या कौटूंबिक पुनर्वसनासाठी संस्थेचे मार्गदर्शक अविनाश मुंडके यांनी योग्य ते आर्थिक सहकार्य केले.