सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली पीएम किसान योजनाच बोगस असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. मी माजी लोकप्रतिनिधी असून या योजनेस पात्र नाही. तरीदेखील आपल्या बॅंक खात्यावर दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये जमा होत आहेत. याप्रकरणी आपण तहसीलदारांना वेळोवेळी सांगून ती रक्कम परत केली आहे. तरीदेखील आपल्या खात्यावर ती रक्कम येत असून ही योजनाच बोगस असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
23 पिकांना आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. ऊस वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळत नसल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. फळे, भाजीपाला तसेच दुधालादेखील जादा दर मिळावा अशी त्यांनी मागणी केली आहे. कधीकाळी ऊस दर समितीत शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा समावेश होता. मात्र आता बोलण्याची हिंमत नसलेली माणसे ऊस नियंत्रण समितीत आहेत. इथेनॉलपासून कारखान्याला मिळणाऱ्या उत्पन्नातील ७५ टक्के वाटा शेतकरी वर्गाला मिळायला हवा. हे ठरवण्याचा अधिकार ऊसदर नियंत्रण समितीला आहे. मात्र ही समिती दुबळी ठरत असेल तर शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही असे राजू शेट्टी यांनी बोलतांना म्हटले. उस लागवडीसाठी किती कष्ट लागतात हे केंद्रात दहा वर्ष कृषीमंत्री राहून चुकलेल्या शरद पवार यांना कळले नसेल तर त्यांची ती दहा वर्ष वाया गेली असे राजू शेट्टी यांनी म्हटले. ऊस हे हमीभाव देणारे पीक असल्यामुळे शेतकरी उसाकडे वळतात असेही शेट्टी बोलतांना म्हणाले