“घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है” असे स्टेटस ठेवणा-या अल्पवयीन मुलाने मुलीच्या वडीलांची बारामती येथे हत्या केल्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला. अशा अल्पवयीन आरोपांविरोधात कठोर कारवाईच्या मागणीसह कठोर उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली.
17 ऑगस्ट रोजी विधानसभेचे अधिवेशन सुरु झाले. 18 ऑगस्ट रोजी बारामती येथे शशिकांत नानासाहेब कारंडे हे त्यांच्या मुलीला शाळेत घेण्यासाठी गेले. त्यावेळी दोन ते तिन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर तिक्ष्ण हत्याराने वार केले. या घटनेत ते मुलीसमोरच रक्ताच्या थारोळ्यात पडले. हा प्रसंग वेदनादायक आणि भयावह असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा गांभिर्याने घेण्याची मागणी त्यांनी केली.
या अल्पवयीन मुलाने यापुर्वी देखील याच पद्धतीने मुलीची छेडखानी केली होती. तो मुलगा अल्पवयीन आहे म्हणून पोलिसांनी त्याला बोलावून बाल न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने देखील त्याला सोडून दिले. सोडून दिल्यानंतर मुलीच्या वडीलांनी त्याला समजावले. मात्र नंतर त्या अल्पवयीन मुलाने थेट मुलीच्या वडीलांची हत्याच केली. हत्या करण्यापुर्वी त्याने “घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है” असे स्टेटस ठेवले होते.
अजित पवार बोलतांना पुढे म्हणाले की, “या गोष्टीच्या खोलात गेल्यावर असं लक्षात येते की, संपूर्ण महाराष्ट्रात या अल्पवयीन मुलांमध्ये हे संघर्ष होत आहेत. आरोपीने हत्येपूर्वी व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडियावर ‘घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है’ असं स्टेटस ठेवलं आणि नंतर त्यांची हत्या केली. राज्यात अल्पवयीन मुलांवर वाढत्या सोशल मीडियाचा हा अशाप्रकारे दुष्परिणाम होत आहे.”
“व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवणं, इंस्टाग्राम, फेसबूक इत्यादी सोशल मीडियाचा वापर वाढल्याने समाजातील अल्पवयीन मुलांवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांनी देखील गुन्हा केला तर त्यांना बालगृहात पाठवणे किंवा सोडून देणे असं न करता कडक कारवाई करावी लागेल. अन्यथा हे लहान मुलं आहेत म्हणून दुर्लक्ष केल्यास समाजात वेगळी परिस्थिती निर्माण होईल. हीच घटना १८ ऑगस्टला बारामतीत घडली. त्याची गंभीर दखल घेऊन शासनाने उपाययोजना करावी,” असंही पवारांनी नमूद केलं.