मुंबई : येत्या सोमवार 23 नोव्हेंबर पासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र शाळा सुरु करणे बंधनकारक राहणार नसल्याची भूमिका राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की येत्या सोमवारपासून राज्यात शाळा सुरु होणार आहे. असे असले तरी शाळा सुरु करणे बंधनकारक राहणार नाही.राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून, समन्वय साधून स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती बघून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबत पालकांची संमती गरजेची असेल. विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे असे देखील बंधन राहणार नाही. शाळा सुरु झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण देखील सुरु राहील.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. शाळेत विद्यार्थी आले नाही तरी त्यांची उपस्थिती, मार्क्स यावर देखील परिणाम होणार नसल्याचे शिक्षण मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.राज्यात सध्यस्थितीत कोरोना नियंत्रणात आलेला असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्ली येथे काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई म.न.पा.कडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सोमवार 23 नोव्हेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील एकही शाळा उघडणार नाही.