वर्धा : वर्धा येथील एका दैनिकाचे संपादक रवींद्र कोटंबकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासह त्यांच्या वाहनवरील चालक देखील जखमी झाला असून दोघांवर सेवाग्रम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी घडलेल्या या घटनेचा पत्रकार संघटनांसह सामाजिक संघटनांनी देखील निषेध नोंदवला आहे.
आपल्या दैनिकाचे कामकाज आटोपून संपादक रविंद्र कोटंबकर हे सेलू येथील त्यांच्या निवासस्थानी जात होते. दरम्यान रात्रीच्या वेळी दडून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वर्धा- नागपूर मार्गावरील दत्तपूर चार रस्त्यात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात कोटंबकर व त्यांचा वाहनचालक असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी राज्य पत्रकार संघटना आणि पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.