जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): नाना पाटेकर अभिनीत “अग्निसाक्षी” हा चित्रपट सन 1996 मधे प्रसारीत झाला होता. एका बर्थ डे कार्यक्रमात जमलेले लोक डीजेच्या तालावर नाचत असतांना त्याठिकाणी चिडलेले नाना पाटेकर डीजेसह विद्युत रोशनाईवर गोळीबार करुन तो कार्यक्रम बंद पाडत असल्याचे दृश्य ”अग्निसाक्षी” या चित्रपटात दाखवण्यात आले. अर्थात चित्रपटातील तो गोळीबार नकली होता आणि ते दृष्य रक्तरंजीत नव्हते. वास्तविक जीवनात चिडलेल्या एका बापाने सिने स्टाईल गोळीबार करुन आपल्या मुलीची हत्या केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला. या गोळीबारीत त्याने त्याच्या जावयावर देखील गोळीबार करुन त्याला जबर जखमी केले.

लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात सेवानिवृत्त सीआरपीएफ जवानाने हा गोळीबार केला. या गोळीबारात त्या सेवानिवृत्त जवानाची मुलगी जागीच ठार झाली तर जावई अत्यवस्थ झाला. पब्लिक मार पडल्याने सीआरपीएफ जवान देखील जबर जखमी झाला. गोळीबारीतून खूनाचा आणि खूनाच्या प्रयत्नाचा दुहेरी प्रकार का घडला? तर त्याचे कारण म्हणजे पोटच्या मुलीने परस्पर केलेला प्रेमविवाह सेवानिवृत्त जवानाला मान्य नव्हता. जवानाच्या मनात साचलेल्या रागातून हा खूनाचा प्रकार घडला. नगराज मंजुळे दिग्दर्शित “सैराट” चित्रपटातील कथानकाप्रमाणे खूनाच्या अनेक घटना देशात आणि राज्यात घडल्या. यापुढे अशा दुर्दवी घटना घडू नये अशी समाजातील सज्जन नागरिकांची अपेक्षा आहे. अशा घटना घडण्यामागे विविध पैलू आणि विविध कारणे देखील असतात.

केंद्रीय राखीव पोलिस बल अर्थात सीआरपीएफ मधून काही महिन्यांपुर्वी सेवानिवृत्त झालेले किरण अर्जुन मंगळे हे धुळे जिल्ह्याच्या शिरपूर येथे आपल्या परिवारासह राहण्यास आहे. सेवानिवृत्तीनंतर ते एका खासगी बॅंकेत नोकरी करत होते. स्वत:च्या रक्षणासाठी ते आपल्या कब्जात परवाना असलेले एक पिस्टल देखील बाळगत होते. मुलगा निखील आणि मुलगी तृप्ती या दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी योग्य रितीने पार पाडली होती. मुलगी तृप्ती हिचे पुणे येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस चे शिक्षण सुरु होते. वैद्यकीय शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ती डॉक्टर म्हणून समाजात वावरणार होती. किरण मंगळे यांनी सीआरपीएफच्या माध्यमातून देशाची सेवा केली तर मुलगी तृप्ती ही वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करणार होती.


पुणे येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना तृप्ती किरण मंगळे आणि अविनाश इश्वर वाघ या दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. दोघे एकाच समाजाचे आणि नात्यातील होते. अविनाशची आई पुणे येथे एका खासगी दवाखान्यात वयस्कर रुग्णांची देखभाल करण्याचे काम करत होती तर तो एका खासगी कंपनीत कामाला होता. तृप्तीच्या तुलनेत अविनाशचे शिक्षण कमी होते. दोघांच्या शिक्षणात तफावत असली तरी दोघांच्या विचारात तफावत नव्हती. दोघांचा सहवास वाढत गेला. सहवासातून दोघांचे विचार जुळून आले. त्यातून दोघे एकमेकांवर प्रेम करु लागले.


शिक्षणाच्या निमित्ताने शिरपूर येथून पुण्यात पाठवलेली आपली मुलगी अविनाशच्या प्रेमात पडल्याची कुणकुण किरण मंगळे यांना लागली. आपण अविनाश सोबत लग्न करणार असल्याचा इरादा तृप्तीने तिचे वडील किरण मंगळे यांच्या कानावर टाकला. त्यांनी तृप्तीला स्पष्ट सांगितले की तुझे आणि अविनाशचे प्रेम आणि तुमचे लग्न मला मान्य नाही आणि मान्य राहणार नाही. वैद्यकीय शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तुझा समाजातील मान मरतब वेगळा असेल. त्यात कमी शिक्षण असलेला अविनाश खासगी कंपनीतील कर्मचारी आहे. त्यामुळे तुझ्या विचारात फेरबदल आणि पुनर्विचार कर असा सल्ला त्यांनी मुलगी तृप्ती हिस दिला. मात्र तृप्तीने वडील किरण मंगळे यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

अखेर गेल्या वर्षी तृप्ती आणि अविनाश यांनी परस्पर प्रेमविवाह केला. आपल्या मुलीने आपल्या मनाविरुद्ध अविनाश सोबत प्रेमविवाह केल्याचा राग किरण मंगळे यांना आला. त्यांच्या मनात संतापाची खदखद सुरु झाली. आपण आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी तिला उच्च शिक्षण दिले. तिला समाजात मान मरतब मिळावा म्हणून प्रयत्न केला. तिच्या भल्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न केला. आपला सर्व प्रयत्न धुळीस मिळाल्याची भावना किरण मंगळे यांच्या मनात निर्माण झाली. आपल्या मुलांचे भले व्हावे ही प्रत्येक पित्याची इच्छा असते. त्याला किरण मंगळे हे देखील अपवाद नव्हते.
अविनाश सोबत प्रेमविवाह केल्यानंतर तृप्ती पुणे येथेच अविनाश आणि त्याची आई प्रियंका या दोघांकडे कोथरुड पुणे येथील डहाणूकर कॉलनीत राहू लागली. आजकालच्या काही मुली आई वडीलांचे ऐकत नाही तर थेट निर्णय घेऊन कळवतात अशी भावना किरण मंगळे यांची झाली आणि त्यातून त्यांच्या मनात तृप्ती बद्दल राग व रागातून त्यांच्या मनातील खदखद दिवसेंदिवस वाढत गेली. इकडे शिरपूर येथे राहणा-या किरण मंगळे यांच्या मनात मुलगी तृप्ती आणी जावई अविनाश वाघ यांच्या बद्दल प्रतिशोध घेण्याचा विचार आकार घेऊ लागला. त्या उलट पुणे येथे दोघे नवविवाहीत पती पत्नी आपल्या संसारात रममाण झाले होते.

दरम्यानच्या कालावधीत अविनाशची बहिण संस्कृती हिचा विवाह जळगाव जिल्ह्याच्या चोपडा येथील प्रदीप गणेश वाडे या तरुणासोबत निश्चित झाला. 27 एप्रिल 2025 ही प्रदीप आणि संस्कृती या दोघांच्या विवाहाची तारीख निश्चीत झाली. आदल्या दिवशी 26 एप्रिल रोजी हळदीचा कार्यक्रम होता. बहिणीच्या लग्नानिमीत्त अविनाश तयारीला लागला. बहिणीच्या लग्नासाठी अविनाशसह त्याची पत्नी तृप्ती, नववधू संस्कृती, अविनाशचा भाऊ ओंकार, आई प्रियंका आणि अविनाशचे चार मित्र असे सर्वजण 26 एप्रिल 2025 च्या सकाळी चोपडा येथे डॉ. आंबेडकर नगरात आले. या दिवशी रात्री आठ वाजेनंतर हळदीच्या कार्यक्रमानिमीत्त डीजेच्या तालावर नाचण्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती.

मुलगी तृप्ती आणि जावई अविनाश हे दोघे पुणे येथून चोपडा येथे लग्न आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी आले असल्याची माहिती किरण मंगळे यांना समजली. चोपडा आणि शिरपूर या दोन गावातील वाहनासाठीचे अंतर साधारण पाऊण तासाचे आहे. तृप्ती आणि तिचा पती अविनाश या दोघांना पिस्टलच्या गोळ्या घालून ठार करण्याचा घातकी विचार किरण मंगळे यांच्या डोक्यात थैमान घालू लागला. किरण मंगळे यांच्या कब्जात परवाना असलेले पिस्टल होते. वडीलांचा विरोध झुगारुन अविनाश सोबत प्रेमविवाह करणा-या चार महिन्याची गर्भवती तृप्तीच्या जीवनातील 26 एप्रिल हा शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र होती. डीजेच्या तालावर नाचत असतांनाच आपला मृत्यु आपल्याच जन्मदात्या बापाकडून पिस्टलच्या गोळीने होणार असल्याची तिला माहिती नव्हती. ते केवळ नियतीला माहित होते.
रात्री आठ वाजेनंतर अविनाशची बहिण संस्कृती आणि तिचा पती प्रदीप वाडे यांच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमानिमीत्त डीजेच्या तालावर नातेवाईकांचे नृत्य सुरु झाले. दरम्यान रात्री सव्वा दहा वाजता किरण मंगळे आणी त्यांचा मुलगा निखील असे दोघे जण मंडपात हजर झाले. किरण मंगळे आणि त्यांची मुलगी तृप्ती या दोघांची नजरानजर झाली. हातात पिस्टल आणि तोंडाला रुमाल लावून आलेला बाप किरण मंगळे समोर दिसताच तृप्ती मनातून घाबरली. आता काहीतरी अघटीत होणार याची जाणीव तिला झाली. तीला विचार करण्याची संधी देखील मिळाली नाही. पुढच्याच क्षणी किरण मंगळे यांनी स्वत:ची मुलगी तृप्ती हिच्या दिशेने पिस्टलची पहिली गोळी झाडली.
पिस्टलच्या एका गोळीतच तृप्ती जमीनीवर कोसळली आणि जागीच ठार झाली. पिस्टलच्या गोळीचा आवाज आल्यानंतर डीजे तात्काळ बंद झाला. प्रत्येक जण सैरावैरा पळू लागला. मंडपात सर्वत्र आक्रोश सुरु झाला. या धांदल गडबडीत खुर्च्यांची मोडतोड देखील झाली. तृप्ती जमीनीवर कोसळल्याचे बघून अविनाश तिच्या बचावासाठी सरसावला. जावई अविनाश वाघ समोर दिसताच संतप्त किरण मंगळे यांनी त्याच्या दिशेने दोन राऊंड फायर केले. एक गोळी त्याच्या डाव्या हाताला तर दुसरी गोळी त्याच्या पाठीवर कमरेजवळ लागली. त्यामुळे तो देखील जमीनीवर कोसळला.
या कालावधीत जमलेले नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी किरण मंगळे यांना पब्लिक मार देण्यास सुरुवात केली. या पब्लिक मारात किरण मंगळे हे जबर जखमी झाले. या गडबडीत त्यांच्या सोबत आलेला त्यांचा मुलगा निखील फरार होण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती समजताच चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आणि त्यांचे सहकारी हे.कॉ. जितेंद्र सोनवणे आणि इतर असे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत पुढील आवश्यक हालचालींना वेग दिला. कडक बंदोबस्त लावून पुढील तपासकामी तातडीने फॉरेंन्सिक लॅब पथकाला पाचारण करण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रिक्षा बोलावून जखमी अविनाश व मयत तृप्ती या दोघांना चोपडा येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी तृप्ती हिस मयत घोषित केले. अविनाश वाघ व किरण मंगळे या दोघा जबर जखमींना अधिकच्या पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले. याप्रसंगी पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चोपडा येथे भेट देत पुढील कारवाईच्या सुचना पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना दिल्या. घटनास्थळावरुन पिस्टलमधून फायर झालेल्या तिन रिकाम्या पुंगळ्या हस्तगत करण्यात आल्या. या घटनेप्रकरणी अविनाशची आई प्रियंका इश्वर वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला किरण मंगळे आणि त्यांचा मुलगा निखिल मंगळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. 266/25 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103 (1), 109 (1), 3(5) शस्त्र अधिनियम 3, 25 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा व गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे व त्यांचे सहकारी करत आहेत.
जखमी अविनाशची अवस्था गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथून पुण्याच्या ससून रुग्णालयात रवाना व दाखल करण्यात आले. त्याच्या पाठीतून पिस्टलची गोळी बाहेर काढण्यात आली. घटनेनंतर पोलिस बंदोबस्तात तृप्तीवर चोपडा येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. दुस-या दिवशी अविनाशची बहिण संस्कृती आणी प्रदीप वाडे यांचा विवाह अगदी साधेपणाने, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत घरगुती मात्र तणावपुर्ण वातावरणात पार पडला.
एका प्रेमप्रकरणाची आणि प्रेमविवाहाची शोकांतिका झाली. प्रत्येक आई बापाला आपली मुलगी सुखात रहावी असे वाटत असते. त्या दृष्टीने ते प्रयत्नशिल असतात. त्यासाठी ते आपल्या मुलाचे अथवा मुलीचे समुपदेशन देखील करत असतात. त्यांचा हेतू चांगला असतो. मात्र प्रेमात वेडी झालेली काही मुले अथवा काही मुली आई बापाचे ऐकत नाहीत. ते परस्पर निर्णय घेतात आणि थेट लग्न करुन आई बापाला निरोप देतात. सिने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने ज्यावेळी प्रेम विवाह केला. त्यावेळी तिचे वडील व प्रख्यात सिने अभिनेता शत्रुघन सिन्हा यांनी अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली होती. आजकालची मुले परस्पर निर्णय घेऊन आई बापांना निर्णय कळवतात ही शत्रुघन सिन्हा यांची प्रतिक्रिया फार बोलकी होती. शांत आणि संयमी आई बाप परिस्थितीसोबत जुळवून घेत स्वत:च्या ह्रदयावर फारसा ताण पडू देत नाहीत. मात्र संतापी बापाकडून प्रसंगी गोळीबारीचा प्रकार देखील घडतो हे चोपडा येथील घटनेतून दिसून येते.