जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): या जगात स्वार्थ आणि जिव्हाळा या दोन प्रमुख घटकांमुळे मनुष्य एकमेकांच्या संपर्कात येतो. पुर्वीचे लोक भावनाशील होते. ते पटकन भावनिक होत आणि एकमेकांच्या मदतीला धावून येत होते. पुर्वीचे लोक एकमेकांमधे प्रेम आणि जिव्हाळा शोधायचे. हळूहळू काळ बदलला. आता भावनिकता लोप पावत असल्याचे आपण बघतो. आता बहुतांश लोक व्यावहारीक अर्थात प्रॅक्टीकल झाले आहेत. आता लोक एकमेकांमधे प्रेम नव्हे तर पैसा शोधतात. आता प्रेमाची जागा स्वार्थाने घेतली आहे. जिकडे स्वार्थ असेल तिकडे मनुष्य धावत असल्याचे आपण बघतो. कोणता मनुष्य आपल्या काय कामात पडेल, किती प्रमाणात उपयोगी पडेल याची चाचपणी करुन त्या प्रमाणात परस्परांसोबत संबंध ठेवले जातात. कुणी एखाद्याच्या तापट अथवा संयमी स्वभावाचा गैरफायदा घेतो. कुणी एखाद्याच्या बुद्धीचा गैरफायदा घेतो. कुणी एखाद्याच्या ओळखीचा गैरफायदा घेतो. कुणी एखाद्याच्या धनसंपदेचा गैरफायदा घेतो. थोडक्यात बोलायचे म्हणजे आपल्या फायद्याचे कुणाकडे काय आहे? याचा शोध घेऊन त्या दृष्टीने संबंध जपले जातात. जळगाव जिल्ह्यच्या पारोळा तालुक्यातील एका धनिक मेहुण्याने आपल्या अपंग, निर्धन आणि व्यसनी शालकाच्या नावाने 53 लाख रुपयांच्या विविध जीवन विमा पॉलीसीज काढून त्याची डोक्यात रॉड मारुन हत्या केली. हत्येनंतर त्याचा अपघाती मृत्यु झाल्याचा बनाव केला. मात्र मात्र पारोळा पोलिस स्टेशनचे चाणाक्ष पोलिस निरिक्षक सुनिल पवार यांनी हा अपघाती मृत्यु नसून घातपात असल्याचे सत्य तपासात हुडकून बाहेर काढले आणि मरण पावलेल्या निष्पाप अपंगाच्या आत्म्याला एक प्रकारे शांती प्रदान केली. सत्याचा विजय होतो हे अवघ्या दहा दिवसांच्या पोलिस तपासातून जगासमोर आले आहे.

जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सिमेवर पारोळा शहर आणि तालुका वसलेला आहे. जळगाव जिल्ह्याच्या पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक या गावी संदीप पाटील हा तरुण रहात होता. कापसाचा व्यापार आणि शेती हे संदीप पाटील याच्या उत्पन्नाचे साधन होते. त्याची आर्थिक बाजू चांगली होती. धुळे जिल्ह्यातील फागणे हे संदीपच्या सासरवाडीचे गाव. सासरवाडीला वृद्ध सासू आणि अपंग शालक समाधान पाटील असे दोघे रहात होते.
संदीपचा शालक समाधान हा अपंग आणि निरक्षर होता. त्याला साधा मोबाईल देखील समजत नव्हता. अपंग असल्यामुळे समाधान याला दुचाकी देखील चालवता येत नव्हती. अपंग, निरक्षर समाधानला दारु पिण्याचे व्यसन जडले होते. तो कोणताही कामधंदा करत नव्हता. त्याची आई मजुरी करुन दोन पैसे घरात आणत होती. त्या पैशावर घर चालत होते. दारु पिण्यास आईने पैसे दिले नाही म्हणजे समाधान घरात आईसोबत वाद घालत असे. त्यामुळे संदीपने शालक समाधानला आपल्या घरी शेवगे बुद्रुक या गावी बोलावून घेतले होते. गेल्या काही महिन्यापासून समाधान हा त्याचा मेहुणा संदीपकडे शेवगे बुद्रुक या गावी राहण्यास आला होता. तो कधी कधी मेहुणा संदीपच्या शेतात कामाला जात होता.

अपंग, निरक्षर, व्यसनी आणि कोणताही कामधंदा नसलेला शालक समाधानच्या जीवावर लाखो रुपये मिळवण्याचा कुविचार संदीपच्या मनात आला. समाधानच्या नावे लाखो रुपयांचे कर्ज काढायचे, लाखो रुपयांच्या विमा पॉलीसीज काढायच्या, त्या पॉलिसींना त्याची आई आणि आपली पत्नी (समाधानची बहिण) या दोघींना नॉमीनी लावून त्याची हत्या करायची. हत्येनंतर पॉलीसीजची रक्कम हडप करायची असा कुविचार संदीपच्या मनात आला. त्या दृष्टीने तो कामाला लागला. समाधानच्या नावे काढलेल्या विमा पॉलीसीजचे हप्ते संदीप भरु लागला. संदीपने समाधानच्या नावावर एका बॅंकेचे विस लाखांचे कर्ज काढल्याचे देखील समजते. त्यानंतर संदीपने समाधानच्या नावावर एक स्कुटी खरेदी केली. त्या स्कुटीचा विमा संदीपने काढला.


समाधानचा खून करुन त्याचा अपघाती मृत्यु झाल्याचा बनाव करुन पैसे हडपण्याचा डाव संदीपच्या मनात घोळत होता. त्या दृष्टीने तो कामाला लागला होता. मात्र हे काम आपल्याला एकट्याला जमणार नाही हे देखील त्याने ओळखले. त्यामुळे या कामात त्याने त्याचा मित्र चंद्रदीप पाटील याला सोबत घेण्याचे ठरवले. चंद्रदीप पाटील हा अमळनेर तालुक्यातील खवशी या गावचा रहिवासी होता. अखेर समाधानच्या जीवनातील अखेरचा दिवस आला. या दिवशी संदीपच्या हातून त्याचा शालक समाधानचे मरण नियतीने लिहून ठेवले होते.


17 एप्रिल 2025 हा दिवस उजाडला. संदीपने कट रचल्याप्रमाणे या दिवशी संदीप आणी चंद्रदीप या दोघांनी समाधानला स्कुटीवर बसवून दारु पिण्यास नेले. समाधानला खायला जेवण आणि प्यायला दारु दिली. आपल्याला न मागता चांगले जेवण आणि दारु मिळत असल्याचे बघून समाधान मनातून सुखावला. आपला मेहुणा किती चांगला आहे असे तो समजत होता. मात्र संदीपच्या माध्यमातून नियतीने आपल्या ताटात काय वाढून ठेवले आहे हे त्याला माहितीच नव्हते. नेहमी दारु पिऊ नको असे आपल्याला सांगणारा मेहूणा संदीप आज आपल्याला दारु का पाजत आहे असा साधा विचार समाधानच्या मनात आला नाही.
रात्री साडे नऊ वाजता दारु पिल्यानंतर संदीप आणि त्याचा मित्र चंद्रदीप पाटील या दोघांनी समाधानला स्कुटीवर बसवून पारोळा धुळे रस्त्यावर आणले. संदीप स्कुटी चालवत होता. स्कुटीच्या डीक्कीमधे संदीपने एक लोखंडी रॉड ठेवलेला होता. स्कुटी रस्त्यातच थांबवून संदीपने दोघांना खाली उतरण्यास भाग पाडले. तिघे गाडीवरुन उतरले. संदीपने स्कुटीच्या डिक्कीतून लोखंडी रॉड बाहेर काढला. तो लोखंडी रॉड संदीपने त्याचा शालक समाधानच्या डोक्यात हाणला. रात्रीच्या अंधारात डोक्यावर लोखंडी रॉडचा आघात झाल्यानंतर समाधान खाली कोसळला. त्याठिकाणी रस्त्यापासून काही अंतरावर दगडांचा ढिग होता. त्याठिकाणी समाधानला टाकून देण्यात आले. त्यानंतर स्कुटी रस्त्याच्या बाजूला टाकून देत तेथून दोघांनी पलायन केले.


जणू काही झालेच नाही अशा थाटात संदीप तेथून थेट घरी आला आणी झोपी गेला. काही वेळाने संदीपच्या भावाला पलीकडून एक फोन आला. फोनवर त्याला समाधानच्या रस्ता अपघाताची माहीती समजली. ती माहिती त्याने संदीपला सांगितली. सर्व काही माहिती असलेल्या संदीपने मदतीचा बनाव करत झोपेतून उठून घटनास्थळ गाठले. संदीपने रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन केला मात्र पत्ता मुद्दाम चुकीचा सांगितला. चुकीचा पत्ता सांगितल्यामुळे रुग्णवाहिका येण्यास जवळपास तासभर वेळ वाया गेला. समाधानचा मृत्यु होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, तो मरण पावल्यानंतर कुणालाही सत्य समजू नये यासाठी त्याने हेतुपुरस्सर रुग्णवाहिका बोलावण्यासाठी चुकीचा पत्ता सांगितला होता.
ब-याच वेळाने रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेतून समाधान यास नजीकच्या पारोळा येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. अधिकच्या उपचारासाठी त्याला धुळे येथे नेण्यात आले. मात्र या कालावधीत समाधानचा मृत्यु झाला. समाधान मयत झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी घोषित केले. दुस-या दिवशी संदीपने या घटनेची माहिती धुळे पोलिसांना दिली. मात्र अपघात पारोळ्यात झाल्याने हे प्रकरण पारोळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
डिवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळाला भेट दिली. मृतदेहासह घटनास्थळ पंचनामा आदी सोपास्कार पुर्ण करण्यात आले. चाणाक्ष नजरेचे पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांना घटनास्थळावरील पाहणीत संशय येण्यास सुरुवात झाली. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांना काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हता.
मयत समाधान ज्याठिकाणी पडला होता त्याठिकाणी दगडांमधे रक्त सांडलेले होते. मात्र त्याठिकाणी अपघात झाल्याच्या कुठेही खुणा दिसत नव्हत्या. समाधानचा ज्या स्कुटीवरुन जातांना अपघात झाल्याचे म्हटले जात होते त्या वाहनाचा एकही पार्ट खरचटलेला नव्हता. स्कुटी अगदी सुस्थितीत होती. त्यामुळे पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक अमरसिंग वसावे आणि इतरांनी सखोल माहिती संकलीत करण्यास सुरुवात केली.
समाधानच्या नातेवाईकांकडून त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजली. समाधान हा अपंग होता. मुळात त्याला गाडीच चालवता येत नव्हती. त्यामुळे तो घटनास्थळावर स्कुटी घेऊन गेलाच कसा? हा यक्षप्रश्न समोर आला. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय खोल होण्यास सुरुवात झाली. त्याची हत्या कुणी व का केली? हे पुढील प्रश्न या निमीत्ताने पुढे आले.
पालिस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेच्या दिवसाचे आणि रात्रीचे पारोळा आणि धुळे शहरातील सिसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. घटना उघडकीस आल्यानंतर मयत समाधानचा मेहुणा संदीप याने त्याला दवाखान्यात आणले होते आणी तो त्याची काळजी घेत होता हा मुद्दा देखील पो.नि. सुनिल पवार यांनी विचारात घेतला. संशयाची सुई संदीपवर स्थिर करत पो.नि. सुनिल पवार यांनी त्याचीच सखोल माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार संदीपला पैशांची मोठी हाव असल्याची माहिती समोर आली. आपल्याकडे आता खुप पैसे येणार आहेत असे संदीप सर्वांना सांगत होता अशी माहिती पो.नि. सुनिल पवार यांना समजली. मात्र हे पैसै कुठून येणार आहेत हे मात्र तो कुणालाच सांगत नव्हता अशी देखील माहिती पो.नि. सुनिल पवार यांना समजली.
त्या माहितीच्या आधारे पारोळा पोलिसांनी समाधानच्या आई आणी बहिणीची चौकशी केली. त्यांनी पोलिसांना असे सांगितले की समाधान अपंग होता. त्याला गाडी चालवता येत नव्हती. त्याला गाडी चालवतांना आम्ही कधी पाहिलेच नाही. त्यामुळे त्याचा अपघात कसा होईल असा प्रतिप्रश्न त्यांनी पोलिसांना केला. जर समाधानला गाडी चालवताच येत नव्हती तर त्याच्या मृतदेहाजवळ गाडी आलीच कशी? याचाच अर्थ घटनेच्या रात्री व घटनेच्या वेळी कुणीतरी त्याच्यासोबत होता.
समाधानच्या नावावर त्याचा मेहूणा संदीप याने चार महिन्यांपुर्वी हीच स्कुटी विकत घेतली होती अशी माहिती तपासात आणि चौकशीत समोर आली. आता गाडी चालवता न येणा-या समाधानसाठी आणि त्याच्या नावावर स्कुटी कशासाठी घेतली? हा प्रश्न साहजीकच समोर आला. समाधान जन्मापासून अपंग आणि त्याच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यामुळे त्याचे शिक्षण झालेले नव्हते. त्यामुळे त्याला मोबाईल हाताळता येत नव्हता आणि स्कुटी चालवता येत नव्हती.
या सर्व प्रश्नांची गुंतागुंत सुरु असतांना पारोळा पोलिसांना या सर्व घडामोडीत सीसीटीव्हीचा एक महत्वाचा तांत्रीक पुरावा मिळाला. घटनेच्या दिवशी म्हणजे 17 एप्रिलला एका सीसीटीव्ही फुटेजमधे संदीप ती स्कुटी चालवत असल्याचे आढळून आले. त्याच्या मागे समाधान आणि चंद्रदीप बसले होते असे देखील सीसीटीव्ही फुटेजमधे दिसून आले. याशिवाय घटनेच्या रात्री आणि घटनेच्या वेळी समान मोबाईल लोकेशनवरुन संदीप आणि त्याचा मित्र चंद्रदीप या दोघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.
समाधान एकटाच गाडी घेऊन गेला आणी त्याचा अपघात झाला असे सांगत दोघांनी पोलिसांची दिशाभुल करण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी दोघांची वेगवेगळी स्वतंत्र चौकशी करत त्यांना पोलिसी खाक्या दाखवला. दोघांची चालबाजी फार वेळ चालू शकली नाही. पोलिसी खाक्या बघून खरी स्टोरी समोर आली. समाधानच्या विम्याचे हप्ते संदीप भरत होता. त्याला समाधानच्या विम्याची रक्कम हवी होती. समाधानच्या नावावर संदीपनेच कर्ज काढले होते असे समजते. जास्तीचा फायदा व्हावा म्हणून मयत समाधानच्या नावावर गाडी घेऊन गाडीचा देखील विमा संदीपने काढला होता. या घातपाताला अपघाती मृत्यु दाखवण्याचा बनाव संदीपने केला. मात्र पोलिसांचा तपास आणि पुरावे तसेच पोलिसी खाक्या बघून दोघांना आपला गुन्हा कबुल करावा लागला.
मात्र या सगळ्या घडामोडीत संदीप एक गोष्ट विसरला. ती म्हणजे समाधानला गाडी चालवता येत नाही हे कुणाला माहिती नसले तरी त्याच्या घरच्यांना माहिती होते. अपघात दाखवण्यात झालेल्या चुका, विसरलेली एक साधी गोष्ट ,संदीपची पैशांची हाव या सर्व गोष्टी निष्पाप व अपंग समाधानचा जीव मात्र नक्कीच घेऊन गेली. पारोळा पोलिसांचा योग्य तपास ख-या गुन्हेगारांपर्यंत पोहोचला आणि सत्य जगासमोर आले. अन्यथा हा एक अपघात म्हणून पोलिस दप्तरी नोंद झाली असती. मात्र दहा दिवसात सत्य जगासमोर आणण्यात पारोळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल पवार आणि त्याचे सहकारी पोलिस उप निरीक्षक अमरसिंग वसावे तसेच हे.कॉ. सुनिल हाटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या घटनेचा पुढील तपास डिवायएसपी विनायक कोते करत आहेत.